वादळी वाऱ्याचा कहर: झाड कोसळून महिलेचा मृत्यू, संपूर्ण गाव अंधारात; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे गावात काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीत रीहानीबाई शांतीलाल बारेला (वय अंदाजे ४५) या शेतात राहणाऱ्या महिलेचा झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या घरावर चिंचेचे मोठे झाड कोसळल्याने त्या झाडाखाली अडकल्या. जेसीबीच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले, मात्र जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेच्या वेळी घरात लहान मुलेही उपस्थित होती, जी किरकोळ जखमी झाली असून त्यांना वेळेवर वाचविण्यात आले. घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठ्या तत्परतेने धाव घेत मदतकार्य हाती घेतले.
वादळ इतके तीव्र होते की संपूर्ण गावात मोठमोठी झाडे उन्मळून पडली, अनेक घरांची पत्रे उडाली, तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर संपूर्ण गावाचा वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला असून अजूनही गाव अंधारात आहे.
शिवस्वराज्य न्यूजचे प्रतिनिधी गावात पोहचल्यावर ग्रामस्थांनी व्यथा व्यक्त केली. कालचा दिवस आमच्यासाठी भयंकर होता. इतके मोठे वादळ, त्यात पाऊस आणि मोठमोठी झाडे घरांवर कोसळली. अनेकांचे संसार उध्वस्त झाले, असे एक गावकरी सांगत होते.
या संपूर्ण घटनेची तातडीने दखल घेत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पळासखेडा मिराचे व नेरी या गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे पूर्ण करून मदतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
असून मृत महिलेच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, तसेच वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा