जामनेर मतदारसंघातील खरी परिस्थिती लपवण्यासाठीच महविकास आघाडीतील पदाधिकारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल – दिलीप खोडपे यांचा भाजपावर गंभीर आरोप - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर मतदारसंघातील खरी परिस्थिती लपवण्यासाठीच महविकास आघाडीतील पदाधिकारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल – दिलीप खोडपे यांचा भाजपावर गंभीर आरोप

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर मतदारसंघात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा कारभार अंदाधुंद पद्धतीने सुरू असून, प्रशासन भाजपाच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच काम करत आहे. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि युवकांमध्ये सरकारविषयी तीव्र नाराजी आहे. हीच वास्तविकता लपवण्यासाठी सत्ताधारी नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ाचे नेते दिलीप खोडपे यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने जामनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एस. टी. पाटील, प्रल्हाद बोरसे, संजय राठोड, संदीप पाटील, दीपक राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

खोडपे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले असतानाही महाविकास आघाडीने संयम बाळगला. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जुन्या घटनांचे संदर्भ घेऊन खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

श्रीरामपूरमधील खटल्यातही खोडा
जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी आणि काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शंकर राजपूत हे जामनेरमध्ये उपस्थित असतानाही त्यांच्यावर श्रीरामपूर येथे जुना वाद उकरून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. संपूर्ण पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेत आहे. मात्र आमचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे आणि सत्य लवकरच जनतेसमोर येईल, असा विश्वास खोडपे यांनी व्यक्त केला.

बोगस मतदारांची संख्या वाढीव – न्यायालयात दाद मागणार
जामनेर शहरात १० ते १५ हजार बोगस मतदार नोंदवले गेले आहेत. यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता आम्ही न्यायालयात धाव घेणार असून त्यासाठी नियोजन सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अतिक्रमण मोहीम केवळ निवडणुकीनंतर?
विधानसभा निवडणुका झाल्यावर अतिक्रमण मोहीम राबवून हातावर पोट असलेल्या लोकांना त्रास दिला जातो. मात्र निवडणुका तोंडावर आल्या की त्यांना मोकळीक दिली जाते. हे दुहेरी धोरण थांबवून अशा नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका अध्यक्ष किशोर पाटील यांनी केली.

न्यायिक भूमिकेतून निर्णय घ्यावा – महाजनांना आवाहन
“जे खरेच गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, पण निरपराध नेत्यांना यात गोवले जाऊ नये. नामदार गिरीश महाजन यांनी राजकीय हेतूने नव्हे तर न्यायिक भूमिकेतून निर्णय घ्यावा,” असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी अजित पवार गटात नुकतेच प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील हेही उपस्थित होते.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads